
राज्यात एकूण 29 महापालिका निवडणुकीसाठीचे मतदान संपले असून मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाला आहे. यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर सर्वांचे लक्ष आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना सत्ता राखणार की महायुती सत्ता मिळवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांची सत्ता आहे. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबई पालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती केल्यामुळे ताकद आणखी वाढली आहे. मात्र आता निवडणुकीचा एक्झिट पोल समोर आला आहे. यात ठाकरे बंधुंना धक्का बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
राज ठाकरेंचे कमबॅक नाहीच
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांनी युती केली होती. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला. ठाकरे बंधु एकत्र आल्याने या निवडणुकीतील रंगत आणखी वाढली होती. खासकरून राज ठाकरेंच्या मनसेवर सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र या निवडणुकीतही राज ठाकरेंच कमबॅक झालेले दिसत नाही. या निवडणुकीत मनसेला 2 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरेंना तितकासा प्रभाव पाडता आलेला नाही.
राज ठाकरेंची पहिलीच युती
मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी पहिल्यांदाच एखाद्या निवडणुकीसाठी थेट युती केली होती. याआधी राज ठाकरेंनी एखाद्या पक्षाला पाठिंबा जाहीर केला होता, मात्र प्रत्यक्षात युती आणि जागावाटप करून मनसे पहिल्यांदाच मैदानात उतरली होती. या युतीचा फायदा मनसेला होताना दिसत नाही. याऊलट या युतीचा फायदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला होताना दिसत आहे. कारण ठाकरे गट 52 ते 59 जागा जिंकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र युती करूनही राज ठाकरेंच्या पदरी निराशा आल्याचे दिसत आहे.
कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
JVC च्या एक्झिट पोलनुसार भाजपला 97 ते 108 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 32 ते 38 जागा मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 52 ते 59 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर मनसेला 2 ते 5 आणि काँग्रेसला 21 ते 25 जागा मिळू शकतात. तर इतरांना 6 ते 9 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप हा या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा अंदाज आहे.
Leave a Reply