
भारतीय चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रासाठी आजचा दिवस अत्यंत दुःखद ठरला. हजारो अजरामर गीतांना आपल्या आवाजाने जिवंत करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले.
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानंतर त्यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
मुंबईच्या गजबजलेल्या आयुष्यात राहूनही आशा भोसले यांचे हृदय मात्र त्यांच्या मुळांशी घट्ट जोडलेले होते. मुंबईपासून सुमारे ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या सांगलीशी त्यांचे खास नाते होते.
सांगली जिल्ह्यातील गोवर या लहान गावात आशाताई भोसलेंचा जन्म झाला. संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांच्या या घरी संगीताची पहिली पाळेमुळे रोवली गेली. गोवरच्या त्या मातीतील सुसंस्कृत वातावरण आणि वडिलांकडून मिळालेली संगीताची देणगी, हाच त्यांच्या आयुष्याचा पाया ठरला.
बालपणीच्या आठवणीत हे छोटेसे गाव सदैव त्यांच्या स्मरणात होते. त्यानंतर वडिलांच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंब उपजीविकेसाठी पुणे, कोल्हापूरमार्गे मुंबईत स्थलांतरित झाले.
वयाच्या नवव्या वर्षी वडिलांचे छत्र हरवल्यानंतर, आशाताईंच्या आयुष्यात संघर्षाचा मोठा काळ सुरू झाला. मोठ्या बहीण लता मंगेशकर यांच्या यशाच्या सावलीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणे, हे त्यांच्यासाठी एक मोठे आव्हान होते.
सुरुवातीच्या काळात अनेक नकार पचवून, त्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर 'नया दौर'पासून ते 'उमराव जान'पर्यंतच्या चित्रपटांतून स्वतःचा ठसा उमटवला. ओ.पी. नय्यर आणि आर. डी. बर्मन यांच्या सोबतीने त्यांनी केलेल्या संगीताच्या प्रयोगांनी भारतीय संगीत विश्वाला एक नवी दिशा दिली.
आशा भोसले यांची 'दम मारो दम', 'दिल चीज क्या है' आणि 'तनहा तनहा' यांसारखी अनेक गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आता त्या आपल्यात नसल्या तरी, त्यांच्या संगीताचा वारसा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सदैव जिवंत राहील.







Leave a Reply