
बीड जिल्ह्यातून समोर आलेल्या एका पत्रामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा या पत्रातून करण्यात आला असून हा धोका रुपाली चाकणकर यांच्याकडून असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित पत्र एसआयटीकडे देण्यात आले असून त्याची सध्या सखोल पडताळणी सुरू आहे. हे पत्र खोडसाळपणातून लिहिले आहे की त्यामागे काही तथ्य आहे, याचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत.
दरम्यान, या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सध्याचे राजकारण इतके विचित्र झाले आहे की, कधी काय होईल याचा काही नेम राहिलेला नाही,” असे त्या म्हणाल्या. अशा प्रकारचे पत्र समोर आले असल्यास त्याची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी दमानिया यांनी अशोक खरात प्रकरणाचा संदर्भ देत, “जर सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याची शक्यता व्यक्त होत असेल, तर खरात यांच्या जीवाला देखील धोका असू शकतो,” अशी शंका व्यक्त केली. तसेच, “या प्रकरणातील सत्य काहीही असो, ते बाहेर येणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply