
9 एप्रिल 2004 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘मस्ती’ या चित्रपटाला आज 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्या या चित्रपटाला हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिल्या एडल्ट कॉमेडींपैकी एक मानले जाते. या चित्रपटाने त्या काळात प्रेक्षकांना प्रचंड हसवले आणि बॉक्स ऑफिसवरही मोठे यश मिळवले. सुमारे 12 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने तब्बल 34 कोटी रुपयांची कमाई करत सुपरहिट ठरला.
चित्रपटाची कथा रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि अफताब शिवदासानी या तीन मित्रांभोवती फिरते. लग्नानंतर आपल्या आयुष्यात कंटाळा आलेल्या या तिघांना त्यांच्या कॉलेजमधील जुन्या ‘मस्ती’च्या दिवसांची आठवण येते आणि पुन्हा एकदा मजा करण्याचा प्लॅन आखतात. मात्र, त्यांच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण येते, जेव्हा एका खून प्रकरणात ते अडकतात. या कथेत अजय देवगणने साकारलेली पोलीस अधिकाऱ्याची विशेष भूमिका आणि अभिनय प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला.
चार मोठ्या कलाकारांनी दिलेला नकार
‘मस्ती’ने त्या काळात एक नवा ट्रेंड निर्माण केला. डबल मीनिंग संवाद, बोल्ड जोक्स आणि एडल्ट ह्यूमर यामुळे हा चित्रपट चर्चेत राहिला. याआधी हिंदी चित्रपटांमधील कॉमेडी प्रामुख्याने कुटुंबासह पाहण्याजोगी असायची, पण ‘मस्ती’ने प्रौढ प्रेक्षकांना लक्ष्य करत वेगळा मार्ग निवडला. चित्रपटातील ‘मस्ती मस्ती’सारखी गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली.
विशेष म्हणजे, हा चित्रपट सुरुवातीला अनेक मोठ्या कलाकारांनी नाकारला होता. हृतिक रोशन, अमीषा पटेल, बिपाशा बसू, फरदीन खान आणि सैफ अली खान यांसारख्या मोठ्या कलाकारांनी स्क्रिप्ट नाकारली होती. त्या काळात एडल्ट कॉमेडी हा धोक्याचा विषय मानला जात होता. मात्र, इंद्र कुमार यांनी नवीन कलाकारांवर विश्वास ठेवत चित्रपट तयार केला आणि तो यशस्वी ठरला.
चित्रपटाचे इतर तीन भाग
या चित्रपटाच्या यशानंतर ‘मस्ती’ ही एक फ्रँचायझी बनली. पुढे ग्रँड मस्ती (2013), ग्रेट ग्रँड मस्ती (2016) आणि मस्ती 4 (2025) असे भाग प्रदर्शित झाले. मात्र, या पुढील चित्रपटांना पहिल्या भागासारखे यश मिळाले नाही.
‘मस्ती’चा प्रवास हे दाखवून देतो की केवळ मोठी नावेच यश मिळवून देत नाहीत तर दमदार कथा आणि योग्य कास्टिंग यांनाही तितकेच महत्त्व असते. अनेक कलाकारांनी नाकारलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि आजही तो एक क्लासिक एडल्ट कॉमेडी म्हणून ओळखला जातो.
Leave a Reply