
इराण आणि अमेरिकेतील तणाव आणखी वाढला आहे, त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांची चिंता वाढली आहे. अशातच आता या संकटाच्या काळात इराण भारताच्या मदतीला धावला आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, होर्मुज सामुद्रधुनी मधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल आकारलेला नाही. पुढे इराणने आगामी काळात भारताला मदत करण्याची घोषणा केली आहे. भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फतहली यांनी सांगितले की, ‘तुम्ही भारत सरकारला विचारू शकता, आम्ही आतापर्यंत कोणताही टोल घेतलेला नाही.’ पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, या कठीण काळात भारत आणि इराण यांचे संबंध मजबूत आहेत आणि दोन्ही देशांचे हितसंबंध समान आहेत.
इराण भारताला मदत करणार
स्वतः संकटात असणाऱ्या इराणने मदतीचे आश्वासन देताना म्हटले की भारतीय जहाजांना होर्मुज सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मदत करू. फतहली यांनी सांगितले की, इराणचा भारत सरकारशी चांगला संपर्क आहे आणि भारतीय जहाजे कोणत्याही अडचणीशिवाय या मार्गाने जावीत अशी त्यांची इच्छा आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताला त्यांच्या 5 विश्वासार्ह आणि खास मित्र देशांपैकी एक मानले आहे, ही खूप महत्त्वाची बाब आहे.
भारतानेही टोल वसूल केल्याच्या बातम्या फेटाळल्या
भारताने यापूर्वी स्पष्ट केले होते की, आपल्या जहाजांना बाहेर काढण्यासाठी इराणला कोणताही टोल दिलेला नाही. विशेष बाब म्हणजे युद्धाच्या काळात होर्मुज सामुद्रधुनीत वाहतूक जवळपास ठप्प झाली होती, तेव्हा भारताची 9 LPG जहाजे या भागातून सुरक्षित बाहेर पडली होती. सध्या सुमारे 15 भारतीय ध्वज असलेली जहाजे फारसच्या आखातात अडकलेली आहेत, तीही लवकरच बाहेर पडण्याची शक्यता आहे.
होर्मुज सामुद्रधुनी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. भारताचा जवळपास अर्धा कच्चा तेल आणि LPG याच मार्गाने येतो. त्यामुळे या भागात अडचण निर्माण झाल्यास भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर आणि व्यापारावर थेट परिणाम होतो. आता फतहली यांनी भारत सरकार आणि भारतीय नागरिकांचे आभार मानले आहे, त्यांनी म्हटले की, या कठीण काळात भारताने एक विश्वासू मित्र म्हणून साथ दिली आहे.
Leave a Reply