
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात भाजप आणि महायुतीने शानदार विजय मिळवला आहे. 12 पैकी 11 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता आली आहे. तसेच 125 पैकी 55 पंचायत समित्यांमध्येही भाजपने विजय मिळवला आहे. अशातच आता या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेले असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत ते पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्याची शक्यता आहे. मात्र या दौऱ्याचे नेमके कारण समोर आलेले नाही. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
दिल्ली दौऱ्यात ते गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातात निधन झाल्यानंतर अनेक राजकीय मुद्दे चर्चेचा विषय बनलेले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रिकरणाची चर्चा जोर धरत आहे, तसेच सुनेत्रा पवार या लवकरच उपमुख्यमंत्रीपदाची सुत्रे स्वीकारणार आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. आपल्या दिल्ली दौऱ्यात ते गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपा हा एक नंबरचा पक्ष
जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले होते की, 2017 मध्ये देखील आम्ही अतिशय चांगली मुसंडी ग्रामीण भगामध्ये मारली होती. 2014 असेल 2019 असेल किंवा 2024 असेल, आम्ही ग्रामीण भागात विधानसभा निवडणुकांमध्ये अतिशय चांगला विजय प्राप्त केला होता. पण यावेळी मात्र त्याहीपेक्षा मोठा विजय मिळाला आहे. त्यामुळे हे जे मिथक होतं, की भाजप हा शहरी किंवा नमशहरी पक्ष आहे, ते आम्ही 2014 मध्ये तोडलं होतं. ते 2017 मध्ये आम्ही अधोरेखित केलं, आणि आता मात्र आम्ही ते पूर्णपणे स्थापित केलं आहे, की भारतीय जनता पार्टी शहर, निमशहर आणि ग्रामीण भागत नंबर एकचा पक्ष आहे.
विकासकामांवर भर
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की म्हणाले की, ‘हा जनतेचा विश्वास आहे, एकूणच या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे ग्राम विकासाचं कार्य हाती घेतलं. ज्या पद्धतीने ग्रामीण भागातील सोई सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्यांनी विविध विकास योजनांमधून सकारात्मक वातावरण तयार केलं, आणि त्याचवेळी महाराष्ट्रातल्या सरकारने जे कार्य करून दाखवलं, त्यामुळे एक मोठा विश्वास जनतेच्या मनात तयार झाला. आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाजप असेल किंवा आमचे मित्र पक्ष असतील त्यांना प्रचंड समर्थन मिळत आहे, आणि त्याचाच हा परिणाम आहे की, आम्ही एवढी मोठी भरारी घेतली आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
Leave a Reply