
Suhas Babar : महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटातला अंतर्गत वाद हा नेहमीच चर्चेत असतो. शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांकडून भाजपाच्या विरोधात आतापर्यंत वेगवेगळी विधाने करण्यात आली आहेत. अगदी अलिकडे भाजपाचे मंत्री गणेश नाईक व शिंदे सेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळाला आहे. या वादात भर म्हणून शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीतच एक धक्कादायक विधान केलं आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खानापूरच्या पळशीमध्ये एका जाहीर सभेतून आमदार बाबर यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान देणारा वक्तव्य केलं आहे. आमच्यासारखे 243 आमदार आहेत म्हणून ते मुख्यमंत्री आहेत, असं बाबर म्हणाले आहेत. इतकच नव्हे तर भाजपसह सगळे पक्ष आपण चालवतो,असं विधानदेखील आमदार सुहास बाबर यांनी यावेळी केले. त्यांच्या या विधानामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी लगावला टोला
बाबर यांच्या विधानानंतर भाजपाच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या या विधानाचा भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला. आमदार सुहास बाबर आणि त्यांचे वडील अनिल बाबर यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यांनी असे का म्हटले? हे त्यांना मी फोन करून विचारतो, असे चंद्रकांतदादा म्हणाले. तसेच ते जर सर्व पक्ष चांगले चालवत असतील तर चांगलेच आहे ना, असा टोलाही त्यांनी आमदार सुहास बाबर यांना यावेळी लगावला. आमदार सुहास बाबर यांच्या या विधानाचा भाजपाने निषेधही नोंदवला आहे. भाजपाचे नेते आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी सुहास बाबर यांनी मुख्यमंत्र्यांचा एकही उल्लेख केल्याचा आरोप करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत इतकी मस्ती कशासाठी असा सवाल देखील पाटील यांनी उपस्थित आहे.
भाजपा पक्ष चालवायला तुमच्या सात पिढ्या…
सुहास बाबरांच्या विधानावर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे. सुहास बाबर आणि त्यांचे स्वर्गीय वडील हे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आमदार झालेत. त्यांची जाणीव त्यांना नाही. तसेच सत्तेची आलेली मस्ती जिल्हा परिषद निवडणुकीत जनता उतरवेल आणि भाजपा पक्ष चालवायला तुमच्या सात पिढ्या याव्या लागतील, असा हल्लाबोल पडळकर यांनी केला. तसेच भाजपाच्या नादाला लागू नका, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला आहे.
सुहास बाबर यांनी काय स्पष्टीकरण दिले
दरम्यान, सांगली जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू आहे. खानापूर आटपाडी तालुक्यामध्ये भाजप विरुद्ध शिंदे सेना अशी लढत होत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर, वैभव पाटील विरुद्ध आमदार सुहास बाबर अशी लढत होत आहे. भाजपाने टीका केल्यानंतर बाबर यांनी मी मुख्यमंत्र्यांना एकेरी शब्द वापरले नाही. माझं विधान स्थानिक कार्यकर्त्याच्या बाबतीत होतं, असं स्पष्टीकरण आमदार सुहास बाबर यांनी दिलं आहे.
Leave a Reply