
अमेरिका आणि इराण यांच्यात 14 दिवसांची शस्त्रसंधी झाली आहे. यामुळे आखातातील जहाज वाहतुकीला काही प्रमाणात सुरुवात झाली आहे. हे युद्ध थांबल्यामुळे भारताला तात्काळ मोठा फायदा होणार आहे. पश्चिम आशियातील तणाव कमी झाल्याने भारताच्या ऊर्जा गरजांवरील संकट टळले आहे, तसेच खाडी देशांमध्ये राहणाऱ्या कोट्यवधी भारतीयांची सुरक्षा सुनिश्चित झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, हे 14 दिवस भारतासाठी ‘ऑपरेशनल’ दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.
भारताची अडकलेली 16 जहाजे मायदेशी रवाना होणार
हे युद्ध सुरु असताना भारतासाठी सर्वात मोठी चिंता फारसच्या आखातात आणि होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या मालवाहू जहाजांची होती. युद्धाच्या काळात या भागात परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. या काळात भारताची 16 जहाजे तिथे अडकली होती आणि त्यांच्यावर सतत हल्ल्याचा धोका होता. मात्र आता या 14 दिवसांच्या युद्धविरामामुळे सुरक्षित मार्ग (सेफ कॉरिडॉर) उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता ही सर्व 16 भारतीय जहाजे सुरक्षितपणे भारतीय किनाऱ्यावर पोहोचणार आहेत.
LPG आणि कच्च्या तेलाची आयात होणार
भारतात मोठ्या प्रमाणावर खाडी देशांतून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू येतो. सरकारच्या म्हणण्यानुसार, युद्धविरामामुळे एलपीजी (स्वयंपाक गॅस) पुरवठ्यात आलेला अडथळा आता दूर होईल. जहाजांची हालचाल सुरू झाल्याने भारतातील इंधनाच्या किंमती आणि साठ्यावर येणारा दबाव कमी होणार आहे. यामुळे पुरवठा सुरळित होण्याची शक्यता आहे. याचा थेट सर्वसामान्यांना फायदा होणार आहे.
1 कोटी भारतीय सुरक्षित
खाडी देशांमध्ये सुमारे 1 कोटी भारतीय राहतात. गेल्या 40 दिवसांच्या संघर्षात 8 भारतीयांचा मृत्यू झाल्याने सरकारची चिंता वाढली होती. युद्धविरामामुळे त्या देशांतील हवाई मार्ग पुन्हा सुरू झाले आहेत, त्यामुळे हे लोक भारतात परतू शकतात. भारताची प्राथमिकता आता या युद्धविरामाला कायमस्वरूपी शांततेत बदलण्याची आहे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही भारतीय नागरिकाला आपले प्राण गमवावे लागू नयेत. इराणमध्ये सध्या सुमारे 7500 भारतीय आहेत. आता युद्ध थांबलेले असताना या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.
Leave a Reply