
भारतीय रेल्वे सातत्याने तांत्रिकदृष्ट्या स्वतःला अधिक आधुनिक करत आहे. हायस्पीड ट्रेन, वंदे भारतसारख्या अत्याधुनिक गाड्या, स्मार्ट स्टेशन, डिजिटल तिकीट प्रणाली आणि सुधारित प्रवासी सुविधा यांमुळे भारतीय रेल्वेचे जाळे आज जगभर चर्चेचा विषय ठरत आहे.
भारतात प्रवास करणारे परदेशी पर्यटक रेल्वेची व्याप्ती, व्यवस्थापन आणि सुविधा पाहून अनेकदा आश्चर्यचकित होतात. सोशल मीडियावरही असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये विदेशी प्रवासी भारतीय रेल्वेचे भरभरून कौतुक करताना दिसतात.
दरम्यान, भारतीय रेल्वेशी संबंधित काही अशीही वैशिष्ट्यपूर्ण आणि थक्क करणारी तथ्ये आहेत, जी आजही अनेक प्रवाशांना अचंबित करतात. त्यापैकीच एक म्हणजे ट्रेन आली की काही क्षणांसाठी स्टेशनवरील वीज गायब होणे आणि हे कोणत्याही बिघाडामुळे नाही तर एका खास तांत्रिक कारणामुळे घडते.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक पोस्ट्सनुसार, तामिळनाडूतील चेन्नईजवळ असलेले ताम्बरम रेल्वे स्टेशन हे देशातील एकमेव असे स्टेशन आहे, जिथे ट्रेन गेली की काही क्षणांसाठी स्टेशनवरील वीजपुरवठा बंद होतो.
प्लॅटफॉर्मवर उभे असलेले प्रवासी अचानक अंधार पडलेला पाहून चकित होतात. अनेक जण याला गूढ घटना समजतात तर काही लोक यामागे तांत्रिक बिघाड किंवा विचित्र कारणे असल्याचं म्हणतात.
प्रत्यक्षात, ताम्बरम स्टेशनवरील ही घटना पूर्णपणे तांत्रिक कारणांमुळे घडते. हे स्टेशन दोन वेगवेगळ्या पॉवर सब-स्टेशन्सच्यामध्ये असलेल्या ‘न्यूट्रल सेक्शन’ मध्ये येते. या न्यूट्रल सेक्शनमध्ये ओव्हरहेड इक्विपमेंट म्हणजेच ट्रेनला वीज पुरवणाऱ्या तारांमध्ये करंट नसतो.
जेव्हा लोकल ट्रेन एका पॉवर झोनमधून दुसऱ्या पॉवर झोनमध्ये प्रवेश करते, तेव्हा काही सेकंदांसाठी वीजपुरवठा बंद केला जातो. याच क्षणी स्टेशनवरील लाईट्सही थोड्या वेळासाठी बंद होतात. मात्र, ही प्रक्रिया नियोजित आणि सुरक्षित असून याचा प्रवाशांच्या सुरक्षिततेवर कोणताही परिणाम होत नाही.






Leave a Reply