
दोन जुने मित्र बऱ्याच दिवसांनी भेटले. त्यांच्यात मस्त गप्पा रंगल्या होत्या. या गप्पा रंगात आलेल्या असताना जुन्या मैत्रिणीचा विषय निघाला. त्यांच्यात एका फोन कॉलवरुन इतकं जोरदार, टोकाचं भांडणं झालं की, एका मित्राने दुसऱ्या मित्रावर कोयता घेऊन सपासप वार केले. धनकवडी भारती विद्यापीठ परिसरात त्रिमूर्ती चौकाजवळ 2 फेब्रुवारीला रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली. चेतन चव्हाण याने बाजूच्या उसाच्या रसवंतीवरील लोखंडी हत्यार घेऊन आदित्य कांबळे याच्या हातावर, डोक्यावर आणि कानाजवळ कोयत्याने वार केले. यात आदित्य गंभीर जखमी झाला असून डोक्यात आणि हाताला 30 टाके पडले आहेत.
गंभीर जखमी असणाऱ्या आदित्य कांबळे या तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.भारती विद्यापीठ परिसरात एक ऊसाची गाडी लागते. तिथे सोमवारी रात्री 8 च्या सुमारास ही जीवघेणी घटना घडली. चेतन आणि आदित्य परस्परांचे खूप चांगले मित्र होते. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनकवडी परिसरात एकच खळबळ
गुन्हा घडला त्या दिवशी दोघे मस्त उभे राहून गप्पा मारत होते. बोलण्याच्या ओघात त्यांच्यामध्ये जुन्या मैत्रिणीचा विषय निघाला. तिला फोन करण्याच्या मुद्यावरुन दोघांमध्ये आपसात इतकी जुंपली की, चेतन चव्हाण याने बाजूच्या उसाच्या रसवंतीवरील लोखंडी हत्यार घेऊन आदित्य कांबळे यांच्यावर वार केले. आदित्यला भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा सगळा भयानक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या खूनी हल्ल्यामुळे धनकवडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Leave a Reply