
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध दोन आठवड्यांसाठी थांबले आहे. हे युद्ध थांबल्यामुळे जगातील प्रत्येक देशाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी अमेरिकेला गंभीर इशारा देताना इराणची सभ्यता नष्ट करण्याची भाषा केला होता. मात्र त्यानंतर काही तासांनी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीचा निर्णय झाला आहे. यावर जगभरातील देशांनी प्रतिक्रिया देताना आनंद व्यक्त केला आहे. काही देशांनी पाकिस्तानच्या भूमिकेचेही कौतुक केले आहे. भारतानेही या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलियाने काय म्हटलं?
ऑस्ट्रेलियाने युद्धबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि परराष्ट्र मंत्री पेनी वाँग यांनी संयुक्त निवेदनात म्हटले की, ‘ऑस्ट्रेलियन सरकार दीर्घकाळापासून तणाव कमी करण्याची आणि हा संघर्ष समाप्त करण्याची मागणी करत आहे. होर्मुज सामुद्रधुनी बंद होण्याची शक्यता, जहाजांवरील हल्ले, नागरी पायाभूत सुविधा आणि तेल-गॅस प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांमुळे ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे आणि इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. ट्रम्प यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले की, ‘अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नाही आणि त्यामुळे चिंता निर्माण होऊ शकते.’
मलेशियाकडून पाकिस्तानचे कौतुक
मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी युद्धबंदी कराराचे स्वागत केले. त्यांनी म्हटले की, ‘हा निर्णय केवळ या प्रदेशासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी शांतता आणि स्थैर्याचा सकारात्मक संकेत आहे. चर्चा प्रामाणिकपणे व्हायला हव्यात आणि कायमस्वरूपी उपाय शोधण्याची खरी इच्छाशक्ती असावी. असा करार केवळ इराणसाठी नव्हे तर इराक, लेबनॉन आणि येमेनसाठीही लागू व्हायला हवी, तसेच पॅलेस्टाईनमधील, विशेषतः गाझामधील, हिंसा आणि विस्थापन थांबवणे गरजेचे आहे. अन्वर इब्राहिम यांनी पाकिस्तानच्या कूटनीतीचे कौतुक करत म्हटले, ‘पाकिस्तानने निर्भय आणि निष्पक्ष संवाद साधण्याची तयारी दाखवली आहे, जी मुस्लिम एकजुटीचे आणि आंतरराष्ट्रीय जबाबदारीचे उदाहरण आहे.’
न्यूझीलंड-कझाकिस्ताननेही पाकिस्तानची थोपटली पाठ
न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स यांनी म्हटले की, ‘ही बातमी सकारात्मक आहे, पण कायमस्वरूपी युद्धविरामासाठी अजूनही महत्त्वाचे प्रयत्न आवश्यक आहेत.’ पुढे बोलताना त्यांनी पाकिस्तान, तुर्की आणि इजिप्तच्या प्रयत्नांचे कौतुक केले. कझाकिस्तानचे राष्ट्रपती कासिम जोमार्ट तोकायेव यांनी मध्यपूर्वेतील युद्धविरामाचे स्वागत केले. त्यांनी म्हटले की, हा करार पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या मध्यस्थीमुळे शक्य झाला. आता हा करार दीर्घकाळ टिकेल आणि जागतिक व्यापार व आर्थिक प्रगतीला चालना देईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
भारताकडून युद्धबंदीचे कौतुक
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या निर्णयावर बोलताना म्हटले की, ‘आम्ही युद्धविरामाचे स्वागत करतो आणि यामुळे पश्चिम आशियात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होईल, अशी अपेक्षा करतो. आम्ही यापूर्वीही सातत्याने म्हटले आहे की, सुरू असलेला संघर्ष शक्य तितक्या लवकर संपवण्यासाठी तणाव कमी करणे, संवाद आणि कूटनीती अत्यंत महत्त्वाची आहे. या संघर्षामुळे लोकांना आधीच मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला आहे आणि जागतिक ऊर्जा पुरवठा तसेच व्यापार नेटवर्कवरही परिणाम झाला आहे. आम्हाला अपेक्षा आहे की होर्मुज सामुद्रधुनीमार्गे जलवाहतूक पुन्हा सुरळीत सुरू राहील.
Leave a Reply