
बॉलिवूडवर 1990 च्या दशकात अंडरवर्ल्डची पकड होते हे अनेकदा समोर आलेले आहे. इंडस्ट्रीतील लोकांनीही ते उघडपणे मान्य केलेले आहे. त्या काळात अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक यांना धमकीचे फोन करून खंडणीची मागणी केली जात होती. तसेच मागणी पूर्ण न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागत होते. मात्र प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एक वेगळेच विधान केले आहे. यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ ऊडाली आहे.
राम गोपाल वर्मा यांनी अलीकडील एका मुलाखतीत त्यांच्या कामावर अंडरवर्ल्डच्या प्रभावाबद्दल धक्कादायक खुलासा केला. वर्मा यांनी गन्स अँड थाईज या आत्मचरित्राबद्दल बोलताना सांगितले की, मी हे पुस्तक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांना समर्पित केले होते, परंतु प्रकाशकांनी नंतर त्यांचे नाव काढून टाकले. जर दाऊद इब्राहिम नसते, तर मी सत्या आणि कंपनी सारखे चित्रपट बनवले नसते. त्यांच्या मुळेच माझे घर चालते.
राम गोपाल वर्मा यांना धमक्या मिळाल्या नाहीत
राम गोपाल वर्मा यांनी पुढे बोलताना सांगितले की, ‘मी एकमेव असा माणूस होतो ज्याला कधी धमकीचे फोन आले नाहीत, कारण त्यांना सत्या आणि कंपनी हे चित्रपट खूप आवडले होते. ते मला त्रास देण्यास इच्छुक नव्हते. मी एका प्रकारे त्यांचा जवळचा मित्र बनलो होतो.’
दोन्ही चित्रपट अंडरवर्ल्डवर आधारित
राम गोपाल वर्मा यांचे सत्या आणि कंपनी हे दोन्ही चित्रपट, मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या वास्तवावर आधारित आहेत. हे दोन्ही चित्रपट ऐतिहासिक क्राइम ड्रामा म्हणून ओळखले जातात, वर्मा यांच्या मते ही गोष्ट त्यांच्यासाठी फायदेशीर ठरली. कारण बॉलीवूड आणि अंडरवर्ल्ड यांच्यातील संबंध हा अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय राहिला आहे. मुंबईचे माजी पोलिस अधिकारी डी. शिवानंदन यांनी पूर्वी म्हटले होते की, गुन्हेगारांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपटांना दाऊदसारख्या व्यक्तींचा पाठिंबा मिळत असे.
सत्या आणि कंपनी या चित्रपटांना पाठिंबा
डी. शिवानंदन यांनी म्हटले की, सत्या, कंपनी, शूटआउट अॅट वडाला आणि शूटआउट अॅट लोखंडवाला यांसारख्या चित्रपटांसाठी गुंडांकडूनच पैसा दिता जात होता. कारण त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेला आकार देण्यासाठी किंवा ती सौम्य करण्यासाठी मदत होत होती. त्यांनी पुढे असा आरोप केला की दीवार आणि मुकद्दर का सिकंदर सारख्या जुन्या चित्रपटांनाही अशाच प्रकारचा पाठिंबा मिळाला होता.
Leave a Reply