
महाराष्ट्रा पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राबवणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. ठाकरे गटाचे ८ खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे या खासदारांची गुप्त बैठक झाल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. पण आता या सर्व चर्चा पोकळ असल्याचे समोर आले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ऑपरेशन टायगरवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय घडलं?
सूत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील एका गुप्त ठिकाणी बुधवारी रात्री एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला एकनाथ शिंदेंसह शिवसेना ठाकरे गटाच्या ९ पैकी ८ खासदार उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी थेट त्यांच्याशी संवाद साधला. या बैठकीला ६ खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर २ खासदार व्हिडिओ कॉलद्वारे जोडले गेले होते. अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, राजाराम वाकचौरे, ओम राजेनिंबाळकर, राजाभाऊ वाजे आणि संजय जाधव अशी हा बैठकीला उपस्थित असलेल्या खासदारांच्या नावे आहेत. या खासदारांना केंद्रात महत्त्वाची पदे मिळतील, असे आश्वासन देण्यात आल्याचे बोललं जात आहे.
श्रीकांत शिंदे काय म्हणाले?
मात्र आता या सर्व खळबळजनक बातम्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. गेल्या वर्षभरापासून अशा अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. ही बातमी देखील त्याच प्रकारची एक अफवा आहे. अशी कोणतीही गुप्त बैठक झालेली नाही. या बातम्यांमध्ये अजिबात तथ्य नाही,” असे श्रीकांत शिंदे यांनी टीव्ही ९ मराठीशी फोनवर बातचीत करताना स्पष्टपणे सांगितले.
त्यासोबतच ठाकरे गटातील खासदारांनी या बैठकीचा दावा फेटाळला आहे. एक लक्षात ठेवा मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरे हे ज्या शिवसेनेचे नेतृत्व करतात, त्या पक्षाचा मी शिवसैनिक आहे. मी मातोश्रीशी प्रतारणा करणार नाही. मी उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही, असे खासदार अरविंद सावंत यांनी ठणकावून सांगितले.
एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे तातडीने आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे या मूळ गावी पोहोचले आहेत. हा दौरा स्थानिक विकासकामांचा आढावा घेण्यासाठी असल्याचे सांगितले जात असले, तरी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे येथे काही दिवस मुक्काम करणार आहेत. त्यानंतर राज्याच्या राजकारणात कोणते नवे वळण येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply