
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या घातपाताचा प्रयत्न प्रकरणातील संशयीत आरोपी अमोल खुणे याची जामिनावर सुटका झाली आहे, जामिनावर सुटका होताच त्याने जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती, या प्रकरणात माझी आणि मनोज जरांगे पाटील यांची नार्को टेस्ट करा, एसआयटी चौकशी करा अशी मागणी त्याने पोलीस अधीक्षकांकडे केली होती, तसेच यावेळी बोलताना काही गंभीर आरोप देखील त्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावर केले होते, मला आंदोलनाबाबत सगळं माहिती आहे, योग्य वेळ आल्यावर सगळं बाहेर काढणार आहे, असं त्याने म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर जरांगे पाटील यांनी खुणेच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटील यांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे, अमोल खुणेच्या अर्जाची अंमलबजावणी करा, दूध का दूध पानी का पानी होऊ जाऊ द्या, अशी मागणी त्यांनी यावेळी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. हे सगळं धनंजय मुंडे हेच घडवून आणत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. अमोल खुणे हा जर धुतल्या तांदळाचा होता तर त्याने म्हणायला पाहिजे होतं, पाचही लोकांच्या धनंजय मुंडे यांच्यासहीत नार्को टेस्ट करा, असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
खुणेच्या आईने आणि पत्नीने सांगितलं होतं की तो पीत आहे. हे पोरग असं आहे की स्वतः सुखाने खायचं नाही आणि घरच्याला देखील सुखाने तुकडे खाऊ द्यायचे नाही. याला कोणीतरी फुस लावेल म्हणून मी एसपींना सांगितले होते. त्याने माझ्यावर आरोप केले ते सिद्ध करावे लागतील, नाहीतर पुढच्या काळात फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत, असा इशारा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी अमोल खुणे याला दिला आहे. तसेच दुसऱ्या जातीच्या लोकांना खुश करण्यासाठी तू आपल्या जातीला डाग लावतो का? असा सवालही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
Leave a Reply