
राज्यात गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. आज राज्यातील 12 जिल्हा परिषदांचा निकाल जाहीर झाला आहे. यात भाजपचे वर्चस्व पहायला मिळाले. अनेक ठिकाणी उमेदवारांनी बोटावर मोजण्याइतक्या मतांनी विजय मिळवला आहे. अशातच आता लातूरमधील एका निकालाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. धाकट्या जाऊबाईने थोरल्या जाऊबाईचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे या निकालाची संपूर्ण राज्यात चर्चा रंगली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
धाकली जाऊबाई ठरली सरस
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील कामखेडा जिल्हा परिषद गटात सख्या भावजया एकमेकांविरोधात निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. काँग्रेस तिकीटावर आशाताई भिसे यांना उमेदवारी मिळाली होती, तर भाजपाकडून सरिता भिसे या रिंगणात उतरल्या होत्या. त्यामुळे या दोघींमधील लढत संपूर्ण जिल्हात चर्चेचा विषय बनली होती. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यात काँग्रेसच्या उमेदवार धाकट्या जाऊ बाई आशाताई भिसे यांनी भाजपाच्या मोठ्या जाऊबाई सरिता भिसे यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला आहे. या निकालात धाकली जाऊबाई सरस ठरल्याचे पहायला मिळाले आहे.
लातूरमध्ये महायुतीची सत्ता
लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत 59 पैकी 18 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादीला 12 आणि शिवसेनेला 1 जागा मिळाली आहे. या तिन्ही पक्षांनी मिळवून 31 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. लातूरमध्ये काँग्रेसला 23 शिवसेना ठाकरे गटाला 1, शरद पवार गटाला 1 आणि इतरांना 3 जागा मिळाल्या आहेत. लातूरमध्ये काँग्रेस जरी सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी या महाविकास आघाडीतील इतर पक्षांना अपेक्षेप्रमाणे यश मिळालेले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.
राज्यात महायुतीचा दणदणीत विजय
राज्यातील 12 पैकी 7 जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. यात सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, सातारा आणि सोलापूर या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्हा परिषदांवर भगवा फडकवला आहे. तर पुणे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीने शानदार विजय मिळवला आहे. सांगलीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे.
Leave a Reply