
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. आजपासून बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरवात झाली आहे. आज यानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थितीत होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर शिवसेनेत झालेल्या गद्दारीवरही भाष्य केलं. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
आपल्याला गद्दाराचा शाप लाभलेला आहे
उद्धव ठाकरे गद्दारीवर बोलताना म्हणाले की, ‘जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो, शिवाजी महाराज आणि त्यांच्या आधी जर पाहिलं तर गद्दारी हा विषय आजचा नाहीये, तो पूर्वीपासून चालत आलेला आहे. तो आपल्याला शापच लाभलेला आहे. जेव्हा विजय अशक्य असतो तेव्हा आपला शत्रू गद्दारांची मदत घेत असतो. गद्दारी जर आजपर्यंत भगव्याशी झाली नसती तर या महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलून दाखवला असता.’
मीही जातो, मला किती पैसे मिळणार…
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, गद्दारी करणांना किती पैसे मिळाले? 50 खोके ना. मग मीच जातो ना मला किती मिळणार? असं केलं तर मला ठाकरेंच नाव घेता येणार नाही. मी नालायक म्हणून या घराण्यामध्ये जन्माला आलो हा शिक्का मी कधी लागू देणार नाही. माझ्या डोळ्यासमोर मुंबईचे तुकडे तोड असतील मी गप्प बसणार नाही. मुठभर असतील तर मुठभर, मुठभरांना घेऊन त्यांच्या छाताडावर प्रहार केल्याशिवाय राहणार नाही. कुठलीही तडजोड करणार नाही.
या देशासाठी मरायला तयार हे आमचं हिंदुत्व आहे
हिंदूत्वावर बोलताना उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, ‘आमचं हिंदूत्व शेंडी जाणवांचं नाही, जो कुणी या देशासाठी मरायला तयार हे आमचं हिंदुत्व आहे. मी मुख्यमंत्री असताना मंत्रालयात फोन उचलला की जय महाराष्ट्र म्हणायचे आणि आता जय महाराष्ट्र धोक्यात आला आहे. आजपासून जय महाराष्ट्र बोलायला सुरु करा. आम्हाला संस्कार आणि हिंदूत्व कुणी शिकवू नये. शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी झाला नाही तर मराठी माणसांच्या हक्कासाठी झाला आहे.
Leave a Reply