
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. जवळपास 6 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, त्या वाढल्या पहिजेत आणि मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण देणारी व्यवस्था उभी राहायला हवी या उद्देशाने आणि हेच मुद्दे अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. प्रेक्षक-समिक्षकांकडून या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळत गेला आणि सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा झाली. त्याचवेळी हेमंतने या चित्रपटातून डिलिट केलेला म्हणजेच काढून टाकलेला एक सीन सोशल मीडियावर पोस्ट केला. अभिनेता संकर्षण कऱ्हाडेवर चित्रित झालेला हा सीन आहे. या सीनवर आता नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘संकर्षण कऱ्हाडे यांचा प्रसंग.. जो काही कारणास्तव चित्रपटात ठेवता आला नाही. पण आता संपूर्ण प्रसंग खास तुमच्यासाठी. मंडळी आपली मातृभाषा हीच भगवंताच्या अधिक जवळ नेणारी भाषा आहे,’ असं कॅप्शन देत हेमंतने हा डिलिट केलेला सीन शेअर केला आहे. यामध्ये संकर्षण मराठी भाषेला जपण्यासंदर्भात वासुदेव, वारी, नंदीबैलवाला अशी विविध उदाहरणं देताना दिसतोय. “रोज सकाळी तुमच्या दारावर जो वासुदेव यायचा, तो येतो का? गोंधळी येतो का? जोगते येतो का? हे सगळं सोडा. ज्याला तुम्ही कौल विचारायचा, तो बुगूबुगू करणारा नंदी येतो का? दुर्दैव आहे मंडळी, ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे. याच्याही पलीकडे जाऊन सावळ्या विठ्ठलाच्या ओढीने निघणारी वारी तरी निघल का”, असे प्रश्न तो विचारताना दिसतोय.
या व्हिडीओवर प्रतिक्रिया देणाऱ्या नेटकऱ्यांमध्येच दोन गट पडले आहेत. त्यापैकी एक गट या डिलिट केलेल्या सीनच्या बाजूने बोलत खंत व्यक्त करतोय. तर दुसरा गट हा सीन घेतला नाही ते बरं झालं, असं समाधान व्यक्त करतोय. ‘बरं झाला काढला, काही उपयोग नव्हता. वासुदेव आणि जी उदाहरणं दिली ती अभिमान आनंदाची गोष्ट आहे का,’ असा सवाल एकाने केला. तर ‘कोणी काहीही म्हणो, मला नाही वाटत चित्रपट केवळ भावनिक होता. सर्व मुद्दे उत्तम मांडले होते,’ असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘हा सीन काढायला नको होता. काहीच चुकीचं नाही या सीनमध्ये,’ असं मत एकाने मांडलंय. तर ‘बरं झालं हा सीन ठेवला नाही. चित्रपट चांगला झाला. अजूनही हरिजन शब्दाचं, वासुदेव, नंदीबैलवाल्याचं आकर्षण संपत नाही ही एक समस्या आहेच. तुमच्या चांगल्या चित्रपटातून ती पुन्हा ठसायला नको होती,’ असं दुसऱ्याने म्हटलंय.
Leave a Reply