
कोल्हापूरच्या कोर्टात एक मोठा खटला सध्या सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं या खटल्याकडे लक्ष आहे. महाराष्ट्रात अशा बऱ्याच केसेस घडत असतात, जिथे खोट्या आरोपांमुळे अन्याय सहन करावा लागतो. अशात बऱ्याचदा निर्दोष व्यक्तींचं आयुष्य पणाला लागतं. ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘जुळली गाठ गं’ या मालिकेत सावी अशाच कठीण प्रसंगाचा सामना करत आहे. या मालिकेची इतकी चर्चा होत आहे की कोल्हापूरमध्ये सर्वत्र #Justiceforsavi असे बॅनर झळकताना दिसत आहेत. मालिकेत काही दिवसांपूर्वी सावीच्या आयुष्यात अंगद हा व्यक्ती आला होता. भाऊंचा विद्यार्थी असल्याचा बनाव करत स्वतःच्या बिझनेससाठी त्याने सावीकडे मदत मागितली होती. मदतीसाठी होकार देऊन सावी नकळत या प्रकरणात अडकते. सावीवर अंगदला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आणि अंगदचा विनयभंग केल्याचा आरोप लावून अटक करण्यात येते.
खरंतर सावीला धैर्यच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकण्यासाठी दामिनीनेच सावीविरोधात हा कट रचला आहे. धैर्यचा सावीवर विश्वास आहे. पण त्याच्या आजारपणाचा फायदा घेत दामिनी आणि घरातील इतर सदस्य त्याला सावीपासून लांब ठेवत आहेत. आता मालिकेत पुढे काय होणार, धैर्यची साथ नसताना सावी या अन्यायाविरोधात कशी उभी राहील, सावी निर्दोष सुटू शकेल का, हे प्रश्न उपस्थित झाले आहेत. पण या प्रकरणात सावीच्या मागे खंबीरपणे उभं राहण्यासाठी पंचकन्यांची साथ तिला मिळणार आहे.
View this post on Instagram
इन्स्पेक्टर मंजू सुरुवातीपासूनच सावीच्या मदतीसाठी धावून आली आहे. कायद्याच्या कचाट्यातून सोडवायला राणीदेखील सावीसोबत उभी आहे. पण आता अर्पिता, अनुप्रिया, आणि वैदही यांचीही साथ सावीला मिळणार आहे. राणी मनू, अर्पिता, अनुप्रिया, वैदेही या पंचकन्या सावीला कसं निर्दोष सिद्ध करतील आणि हे करताना त्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागेल? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून आहे. 2 फेब्रुवारीपासून रात्री 8 वाजता सन मराठी वाहिनीवर मालिकेतील हा ट्विस्ट पहायला मिळणार आहे. या मालिकेत पायल मेमाणे, संकेत निकम, शिवानी घाटगे यांच्या मुख्य भूमिका आहेत. यामध्ये पायल ही सावीची भूमिका साकारतेय तर धैर्यच्या भूमिकेत संकेत आहे.
Leave a Reply