
भारतामध्ये दररोज सुमारे 13,000 प्रवासी गाड्या धावतात आणि भारतीय रेल्वे ही जगातील चौथी सर्वात मोठी रेल्वे व्यवस्था म्हणून ओळखली जाते.
वंदे भारतसारख्या अत्याधुनिक गाड्या ताशी 150 किमीपेक्षा अधिक वेगाने धावत असताना, भारतीय रेल्वेच्या जाळ्यात एक अशी अनोखी ट्रेन आहे, जिने वेगाला मागे टाकत प्रवासाचा अनुभवच सर्वात मोठे आकर्षण बनवले आहे.
ही ट्रेन अवघ्या 46 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी तब्बल 5 तास घेते. म्हणजेच तिचा सरासरी वेग फक्त ताशी 9 किलोमीटर इतका आहे. वेगाच्या या युगात इतकी संथ धावणारी ही ट्रेन नेमकी कोणती आहे आणि तिला इतका वेळ का लागतो, हे जाणून घेऊयात सविस्तर
भारतामधील सर्वात मंद गतीने धावणारी ट्रेन म्हणजे निलगिरी माउंटन रेल्वे. ही ट्रेन तामिळनाडू राज्यातील मेट्टुपलयम ते ऊटी दरम्यान धावते. विशेषतः ऊटी आणि कुन्नूरला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये ही ट्रेन प्रचंड लोकप्रिय आहे.
या ट्रेनची लोकप्रियता इतकी आहे की तिकीटांसाठी अनेक दिवस आधीच बुकिंग करावे लागते. निलगिरी माउंटन रेल्वेचा मार्ग अत्यंत डोंगराळ आणि वळणावळणाचा आहे. ही ट्रेन रॅक अँड पिनियन सिस्टिमवर चालते.
जरी ही ट्रेन भारतातील सर्वात संथ ट्रेन म्हणून ओळखली जात असली तरी तिचा प्रवास वेगासाठी नाही तर शांतता, सौंदर्य आणि अनुभवासाठी केला जातो. येथे प्रवाशांना घाई नसते तर प्रत्येक क्षण जगण्याची संधी मिळते.





Leave a Reply