
आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा प्रकारच्या कोणत्याही ऑपरेशन टायगरच्या चर्चा फेटाळून लावल्या असल्या तरी शिंदे गटाचे मंत्रीच आता ऑपरेशन टायगर होणार असल्याचे संकेत देत आहेत. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी तर महिन्याभरातच ऑपरेशन टायगर होणार असल्याचं सांगून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि ठाकरे गटात दुसरा मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे दाट संकेत मिळत आहेत. यावेळी ऑपरेशन टायगरमध्ये फक्त खासदार टार्गेट असल्याचंही सांगितलं जात आहे.
मंत्री संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधताना ऑपरेशन टायगरवर बिनधास्त विधान केलं आहे. आम्ही कोणाशी संपर्क साधला नाही. स्वतःहून अनेकजण एकनाथ शिंदेंबरोबर संपर्क साधत आहेत. ऑपरेशन टायगर सांगून केलं जाणार नाही. ऐन वेळेला एकनाथ शिंदे निर्णय घेतील, त्यावेळेस आपल्याला कळेल.कोणतेही ऑपरेशन करताना त्याचा बँड बाजा वाजून ते करत नसतात. आमदार, खासदार आणि पदाधिकारी रोजच्या रोज एकनाथ शिंदेंकडे येत असतात. रोज त्यांना सांगत असतात. परंतु योग्य वेळी निर्णय घेणे ही एकनाथ शिंदे यांची ख्याती आहे, असं सांगतानाच तुम्हाला या महिन्याभरामध्ये हे ऑपरेशन टायगर आहे की आणखी काही आहे हे कळेल, असं सूचक विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे.
स्फोट शेवटच्या टप्प्यात
ऑपरेशन टायगर कोणत्या टप्प्यात आहे? असा सवाल शिरसाट यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता हे सगळं शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे तुम्हाला आता जास्त वाट पाहावी लागणार नाही. लवकरच याबद्दलचा स्फोट तुम्हाला उबाठामध्ये झालेला दिसेल, असंही शिरसाट यांनी थेटच सांगितलं.
तुम्ही कीव करा, आम्ही ऑपरेशन
यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांच्यावर टीका केली. अरविंद सावंत यांनी ऑपरेशन टायगरची कीव येते असं म्हटलं होतं. शिरसाट यांनी त्यावर पलटवार केला. अरविंद सावंत तुम्ही कीव करत बसा. कीव करत बसता बसता अख्खा पक्ष फुटला. आमदार गेले, खासदार गेले, पदाधिकारी गेले आणि तुम्हाला कीव करावीशी वाटते. तुमची कीव आता महाराष्ट्राला येत आहे. तुम्हाला कीव करायची असेल तर संजय राऊतची करा आणि त्या उबाठाची करा आमचं जे ऑपरेशन आहे ते चालू राहील, असंही त्यांनी सांगितलं.
कोण अपयशी? देणंघेणं नाही
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं. कोणत्या पक्षात काय चाललंय याच्याविषयी आम्हाला काही देणंघेणं नाही. आम्हाला फक्त एवढेच माहीत होतं की, सुनेत्रा वहिनींची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. अजितदादांचे योगदान बारामतीसाठी फार मोठं आहे. त्यांना श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे होती. आता इंटरनल पॉलिटिक्स काय आहे, तटकरे अपयशी की प्रफुल पटेल अपयशी? या भानगडीत आम्ही पडणार नाही, असंही ते म्हणाले.
Leave a Reply