
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी आणि कणकवली नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली असून, ७४% विक्रमी मतदानानंतर मतदारांनी कोणाला कौल दिला हे स्पष्ट होईल. या निवडणुकीत सिंधुदुर्गात राणे बंधूंमधील चुरस लक्षवेधी ठरली. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली, तर त्यांचा सामना शिंदे शिवसेनेच्या निलेश राणे यांच्याशी झाला. महायुतीतील घटक पक्षही इथे स्वबळावर लढले, तर महाविकास आघाडीतील पक्षांनीही स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. निवडणुकीच्या प्रचारात निलेश राणेंनी भाजपवर गंभीर आरोप केले. राजकीय संस्कृती बिघडवल्याचा आणि मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी स्टिंग ऑपरेशन करत निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने ते न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेनेही प्रचारात पूर्ण ताकद लावली होती. आता हे निकाल जिल्हा परिषदेच्या राजकारणावरही परिणाम करतील.
Leave a Reply