
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून, शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईत अज्ञात व्यक्तींनी पोस्टर्स लावून राजकीय चर्चांना तोंड फोडले आहे. या पोस्टर्सवर कोणत्याही राजकीय पक्षाचा उल्लेख नाही, परंतु त्यांचा रोख स्पष्टपणे उद्धव ठाकरे यांच्यावर असल्याचे दिसते. “जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार?”, “मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नको, मुंबईचा रंग बदलू देऊ नको” आणि “BMC IS NOT A FAMILY BUSINESS” असे संदेश या पोस्टर्सवर आहेत. गेली पंचवीस वर्षे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची मुंबई महापालिकेत सत्ता आहे. या पोस्टर्सच्या माध्यमातून त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर सर्वच राजकीय पक्ष मुंबई महापालिकेत आपले अस्तित्व पणाला लावणार आहेत. त्यापूर्वीच मुंबईभर लागलेल्या या पोस्टर्समधून मुंबईकरांना किंवा मराठी माणसाला जागृत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. हे पोस्टर्स निवडणुकीपूर्वीचे राजकीय रणशिंग फुंकल्याचे संकेत देत आहेत.
Leave a Reply