
नांदेडच्या धर्माबादमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीदरम्यान मतदारांना तीन तास डांबून ठेवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. धर्माबाद येथील एका मंगल कार्यालयात शेकडो मतदारांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पैशाचे आमिष दाखवून डांबल्याचा आरोप मतदारांनी केला आहे. विरोधकांना याची माहिती मिळताच त्यांनी धाव घेऊन मतदारांना बाहेर काढले. या घटनेनंतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी भिंतीवरून उड्या मारून पळून गेले.
याचवेळी, धर्माबादमधील गोरोबा काका मंदिरातही जवळपास 100 महिलांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. प्रसादाच्या स्वरूपात 4 हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून त्यांना येथे ठेवल्याचे महिलांनी सांगितले. कपबशीच्या निवडणूक चिन्हाशी संबंधित लोकांनी हे कृत्य केल्याचा दावा महिलांनी केला. मतदान केंद्राबाहेर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ झाला असता पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. या सर्व प्रकारावर भाजप आमदार राजेश पवार यांनी आरोप फेटाळले असून, आपली चौकशी करावी अशी मागणी केली. नांदेडच्या तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी दोन्ही घटनांची दखल घेतली असून चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
Leave a Reply