
धुरंधर चित्रपटाला रिलीज होऊन दोन आठवडे होत आले, तरी अजून या चित्रपटाची हवा कमी झालेली नाही. उलट दिवसेंदिवस या चित्रपटाचे समर्थक आणि विरोधक यांची संख्या वाढत चालली आहे. धुरंधर सुपरडूपर हिट चित्रपट ठरला आहे. दररोज हा चित्रपट कमाईचे नवीन उच्चांक प्रस्थापित करतोय यात अजिबात शंका नाही. पण त्याचवेळी चित्रपटाला विरोध करणाऱ्यांची सुद्धा संख्या कमी नाही. विरोधक धुरंधर चित्रपटाला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडत आहेत. या चित्रपटाला प्रोपेगेंडा फिल्म ठरवण्यात येत आहे. धुरंधर चित्रपटामुळे भाजप आणि आरएसएसचा फायदा आहे, असं बोललं जातय. धुरंधरला प्रोपेगेंडा ठरवून वेगवेगळे आरोप केले जातायत. या आरोपांना चित्रपटाचे रिसर्च कन्सल्टंट आदित्य राज कौल यांनी उत्तर दिलं आहे.
“भाजप आरएसएसच या चित्रपटाशी काही देणंघेणं नाही. तुम्ही स्वतंत्रपणे चौकशी करा. लोकांसमोर सत्य आणा. धुरंधर, दिग्दर्शक आदित्य धर यांच्यावतीने मी सर्व प्रेक्षकांचे आभार मानतो. मी चित्रपटाचा रिसर्च कन्सल्टंट होतो. खरं काय ते प्रेक्षकांना सांगणं ही माझी जबाबदारी होती” असं उत्तर आदित्य राज कौल यांनी दिलं. “मुंबईवर झालेला 26/11 दहशतवादी हल्ला, त्यातले पीडित, IC 814 हायजॅक, पुलवामा किंवा कुठलाही दहशतवादी हल्ला मला प्रोपेगेंडा वाटत नाही. जे तथ्य आहे, ते आम्ही चित्रपटाच्या माध्यमातून मांडलं आहे” असं आदित्य राज कौल धुरंधर प्रोपेगेंडा चित्रपट असल्याच्या आरोपावर उत्तर देताना म्हणाले.
आरोप खोडून काढताना काय म्हणाले?
“जहरु मिस्त्रीची स्टोरी जे गुन्हेगार आहेत ते मुस्लिम असले तरी आम्ही सगळ्या समाजाला जबाबदार धरत नाहीय. आम्ही त्यांची आणि त्या संघटनांची नाव सांगत आहोत. लष्कर ए तयैबा, जैश ए मोहम्मद, त्यात चुकीचं काय? मला हा प्रोपेगेंडा वाटत नाही” अशा शब्दात आदित्य राज कौल यांनी आरोप खोडून काढले.
हे काश्मीर फाइल्ससोबतही झालं
याचा भाजपला फायदा होतोय. काहींनी म्हटलय की याची स्क्रिप्ट मोदींनी लिहिली आहे, त्यावर आदित्य राज कौल एवढच म्हणाले की, ‘यावर मी काय बोलणार’. “एक सिंडिकेट आहे. बॉलिवूड असेल मीडिया अन्य क्षेत्रात जे ठराविक लोकांना, फिल्म मेकर्सना राष्ट्रवादी ठरवत आहेत. हे काश्मीर फाइल्ससोबतही झालं. त्यात तिथला दहशतवाद, काश्मिरी पंडितांची स्थिती यावर भाष्य करण्यात आलं होतं. पण या सगळ्या टीकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद देऊन उत्तर दिलं. 200 कोटी या कमाईचं फक्त पैशात मुल्यांकन करता येणार नाही” असं आदित्य राज कौल म्हणाले.
Leave a Reply