
Dhurandhar Lyari Pakistan: भारतापासून पाकिस्तानपर्यंत, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपट धुरंधरने पुन्हा एकदा कराचीच्या ल्यारी भागाला चर्चेत आणले आहे. आदित्य धरच्या या स्पाय थ्रिलरमध्ये रणवीर सिंग, संजय दत्त आणि अक्षय खन्ना यांसारखे तारे आहेत. चित्रपटात पाकिस्तानच्या या कुप्रसिद्ध ल्यारी भागातील गँगवारची कथा पडद्यावर आणली आहे. चित्रपटात अक्षय खन्नाने रहमान डकैतची भूमिका साकारली आहे. तर संजय दत्तने एसपी चौधरी असलमची भूमिका साकारली आहे. पण ही फक्त एक काल्पनिक कथा आहे का? नाही, धुरंधर वास्तविक घटनांवरून प्रेरित आहे. २००० च्या दशकात हा भाग एक रक्तरंजित युद्धाचे मैदान बनला होता. येथे गँगवारच्या आगीने शेकडो जीवन उद्धवस्त झाले. येथे ड्रग्स, एक्सटॉर्शन आणि शस्त्रास्त्रांच्या व्यवसायाचे अधिराज्य होते. पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)च्या राजकीय संरक्षणाने वाढलेल्या गुन्हेगारी सिंडिकेटने ल्यारीला ‘नो-गो झोन’ बनवले होते.
ल्यारीचा उदय: फुटबॉलपासून फायरफाइटपर्यंत
ल्यारी कराचीचा सर्वात जुना आणि घनदाट लोकवस्ती असलेला भाग आहे, जिथे बालोच, कच्छी, सिंधी आणि इतर समुदाय शतकानुशतके वसाहती आहेत. १९व्या शतकात हा भाग एक मजूर वसाहत होता, जिथे डॉक वर्कर्स आणि ट्रक ड्रायव्हर्स राहत होते. १९६०-७० च्या दशकापर्यंत येथे अंमली पदार्थांचा छोटा-मोटा व्यापार फुलत चालला होता. पण अफगाणिस्तानच्या सोव्हिएत युद्धानंतर (१९७९-८९) शस्त्रास्त्रे आणि ड्रग्सचा पूर आला होता. बेरोजगारी आणि गरीबीने युवकांना गँगकडे ढकलले होते.
ल्यारी ‘मिनी ब्राझील’ म्हणून ओळखले जात असे. म्हणजे येथे फुटबॉल क्लबची भरभराट आणि ऑलिंपिक बॉक्सर हुसैन शाह यांसारखे तारे इथूनच होते. पण १९८० च्या दशकापासून जातीय राजकारणाने रंग बदलला. पीपीपी येथे मजबूत होती, पण मतदारवर्ग नियंत्रित करण्यासाठी पक्षांनी गँगशी हातमिळवणी केली. म्युत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (एमक्यूएम) आणि पीपीपीमधील संघर्षाने हिंसेला हवा दिली. १९९० च्या दशकापर्यंत ल्यारीत छोटे-मोठे गुन्हेगारी गट उदयास आले, जे अपहरण, एक्सटॉर्शन आणि ड्रग ट्रॅफिकिंगमधून कमावत होते.
गँगवारची मुळे: हाजी लालू विरुद्ध दादल आणि नंतर रहमान डकैतचा उदय
ल्यारीच्या आधुनिक गँगवारची सुरुवात १९६० च्या दशकातील चरस व्यापारापासून झाली. दादल, शेरू आणि ‘काळा नाग’ ही नावे त्या काळातील गुन्हेगारी जगतात प्रभावी होती. १९९० च्या दशकात अभ्यासू गुन्हेगारांची नवीन पिढी समोर आली. जसे इकबाल उर्फ बाबू डकैत, ज्याने ड्रग नेटवर्कला अधिक संघटित केले. याच काळात उदयास आलेले सर्वात प्रभावशाली नाव म्हणजे सरदार अब्दुल रहमान बालोच, ज्याला ल्यारी आणि उर्वरित कराचीमध्ये रहमान डकैत म्हणून ओळखले जात होते.
रहमान डकैत: डाकूपासून ‘पीसकीपर’ पर्यंतचा प्रवास
सरदार अब्दुल रहमान बालोच, उर्फ रहमान डकैत (१९७५-२००९), ल्यारी गँगवारचा चेहरा होता. एका छोट्या गुन्हेगारी कुटुंबात जन्मलेल्या रहमानने किशोरवयातच गुन्हेगारीच्या जगात पाऊल टाकले. स्थानिकांच्या मते, त्याने वयाच्या १३व्या वर्षी पहिली हत्या केली. ही हत्या अतिशय क्रूर होती. घरगुती भांडणात त्याने थेट आईचा खून केला. त्याने आईची हत्या करुन मृतदेह पंख्याला टांगला होता. त्याच्यावरील हा गुन्हा कधीच सिद्ध होऊ शकला नाही. पण हे त्याच्या क्रूरतेचे उदाहरण बनले.
२००१ मध्ये हाजी लालू गँगच्या पतनानंतर रहमानने नियंत्रण घेतले. त्याने ड्रग्स, जुगार आणि एक्सटॉर्शनमधून लाखो रुपये कमावले, पण सोबतच क्लिनिक, मदरसे आणि फुटबॉल टूर्नामेंटसाठी निधी पुरवले. २००८ मध्ये पीपीपीने त्याला ‘पीपल्स अमन कमिटी’ (पीएसी) चे प्रमुख बनवले. ही ‘शांती समिती’ मतदारवर्ग संरक्षणाचा बहाणा होती, पण वास्तवात गँगचे कव्हर बनले होते. रहमानला पीपीपी नेते जुल्फिकार मिर्जा आणि राष्ट्रपती आसिफ अली जरदारीचे संरक्षण होते.
सरदार अब्दुल रहमान बालोचचे शत्रुत्व अरशद पप्पूशी होते, जो एमक्यूएम समर्थित होता. २००३ मध्ये अर्शदने उजैर बालोच (रहमानचा चुलत भाऊ) च्या वडिलांची हत्या केली. त्यामुळे रक्तरंजित युद्ध सुरू झाले. शेकडो मृत्यू झाले. ‘धुरंधर’ चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेली अक्षय खन्नाची भूमिका रहमानला एक खतरनाक, क्रूर डाकू म्हणून दाखवतो. खरंतर ही भूमिका वास्तवाशी अतिशय मिळतीजुळती आहे.
एसपी चौधरी असलम: ‘एनकाउंटर स्पेशलिस्ट’ ची आगी उगळणारी बंदूक
चौधरी असलम खान (१९६३-२०१४) पाकिस्तानचा सर्वात वादग्रस्त पोलिस अधिकारी होता. १९८० च्या दशकात सिंध पोलिसमध्ये एएसआय म्हणून दाखल झालेल्या असलमला ‘पाकिस्तानचा डर्टी हॅरी’ म्हणून ओळखले जात असे. तो क्राइम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट (सीआयडी) चा प्रमुख होता आणि ल्यारी टास्क फोर्सचा लीडर होता.
असलमने तालिबान आणि गँगविरुद्ध निर्दयी कारवाई केली. २००६ मध्ये तो मशूक ब्रोही एनकाउंटरसाठी तुरुंगात गेला, पण २००७ मध्ये त्याला सोडून देण्यात आले आणि तो पुन्हा सेवेत रुजू झाला. २००९ मध्ये त्याने रहमान डकैतला ‘एनकाउंटर’ मध्ये ठार मारले. रहमानच्या पत्नीने हे बनावट असल्याचे म्हटले आणि सिंध हायकोर्टने असलमवर एफआयआर नोंदवण्याचा आदेश दिला. २०१२ च्या ऑपरेशन ल्यारीमध्ये असलमने उजैर बालोचच्या गँगवर हल्ला केला, पण १२ पोलिस कर्मचारी मारले गेले.
असलमला तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) कडून धमक्या मिळत होत्या. ९ जानेवारी २०१४ रोजी ल्यारी एक्सप्रेसवेवर सुसाइड बॉम्बिंगमध्ये त्याचा मृत्यू झाला. टीटीपीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. ‘धुरंधर’ मध्ये संजय दत्तने असलमही भूमिका साकरील आहे. तो सतत सिगारेट ओढत, बंदूक चालवत विचित्र कृत्य करतो. त्याची ही भूमिका वास्तविक प्रतिमेवरून प्रेरित आहे. असलमच्या पत्नीने चित्रपटावर आक्षेप घेतला, त्याला प्रोपगंडा म्हटले.
रक्ताची होळी आणि राजकीय खेळ
रहमानच्या मृत्यूनंतर उजैर बालोचने कमान सांभाळली. २०१३ मध्ये अरशद पप्पूचे अपहरण करून त्याचे शीर धडापासून वेगळे केले. विरोधी गँगने त्याच्या डोक्याचा वापर फुटबॉल खेळण्यासाठी केला होता. बाबा लाडलासारख्या गुंडांनी बंड केले. २००४-१३ च्या काळात ८०० पेक्षा जास्त मृत्यू झाले. पीपीपी आणि एमक्यूएमच्या राजकारणाने आगीत तेल ओतले. गँग मतदार जागृतीसाठी वापरले जात होते.
असे सांगितले जाते की आज ल्यारी खूप शांत आहे, फुटबॉल क्लब पुन्हा सक्रिय आहेत, आणि २०२४ मध्ये एका स्थानिक टीमने नॅशनल यूथ चॅम्पियनशिप जिंकली. पण जखमा अजूनही आहेत. उजैरबद्दल सांगितले जाते की तो आजही तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
Leave a Reply