
मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पार्थ पवारांची पाठराखण करताना अधिकाऱ्यांवर खापर फोडले. संबंधित जमीन व्यवहाराला अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता, असे अजित पवारांनी म्हटले होते. त्यांच्या या भूमिकेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. दमानिया म्हणाल्या की, “पार्थ पवार काही छोटं बाळ नाही, आणि त्यांनी केलेला हा व्यवहार केवळ एक चूक नसून ती सरळसरळ फसवणूक आहे. त्यांनी कागदपत्रांमध्ये बदल करून सेल डीड केले आणि ताबाही घेतला.” या प्रकरणी पार्थ पवारांचे वडील म्हणजेच अजित पवारांचे सरकारमध्ये वजन असल्यामुळे कोणीही महसूल खात्यातील अधिकारी त्यांना नकार देऊ शकला नाही, असा आरोपही दमानिया यांनी केला. त्यांनी अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवू नये असे आवाहन करत, “हायकोर्टानेही पार्थ पवार या प्रकरणात आरोपी का नाहीत?” असा प्रश्न विचारल्याचे निदर्शनास आणले. मुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून, दोषींवर कारवाई होईल अशी अपेक्षा दमानिया यांनी व्यक्त केली.
Leave a Reply