
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानाचा पारा घसरला आहे. ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, थंडीसोबतच वाढते प्रदूषण ही चिंतेची बाब ठरत आहे. मुंबईत धुक्यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. पुण्यातील नागरिकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे.
मुंबई आणि उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून पहाटेच्या वेळी दाट धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तास मुंबईकरांसाठी थंडीचे असतील. मुंबईचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. धुक्यामुळे रस्ते आणि महामार्गावर सकाळी ५ ते ९ या वेळेत दृश्यमानता (Visibility) कमालीची घटली आहे. यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. तसेच अपघाताची शक्यता टाळण्यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे शहरात गेल्या आठ दिवसांत हवेतील प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आहे. हिवाळ्यातील वारे आणि वाढते बांधकाम व वाहने यामुळे प्रदूषणाचे कण हवेतच साठून राहत आहेत. पुण्यात अनेक भागांत एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) १८० च्या पार पोहोचला आहे. नागरिकांनी तक्रार केली आहे की, शांत बसल्यावरही दम लागत आहे आणि डोळ्यांची जळजळ होत आहे. पुणे शहरावर सकाळ-संध्याकाळ धुराचे लोट आणि धुक्याचे मिश्रण दिसत आहे. जे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानले जाते.
हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. प्रामुख्याने धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांत तापमानात मोठी घट होणार आहे. काही ठिकाणी पारा १० अंशांच्या खाली जाण्याची शक्यता असल्याने पिकांनाही याचा फटका बसू शकतो.
तज्ज्ञांचा सल्ला काय?
श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्तींनी पहाटे घराबाहेर पडणे टाळावे.
बाहेर जाताना मास्कचा वापर करावा.
धुक्याच्या वेळी वाहनांचे हेडलाईट आणि फॉग लाईट सुरू ठेवावेत.
दिवसा तापमान अधिक असल्याने पुरेसे पाणी प्यावे, जेणेकरून डिहायड्रेशन होणार नाही.
Leave a Reply