
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मराठी भाषेवरून मराठी आणि परप्रांतीयांमध्ये मोठा वाद सुरु आहे. अनेकदा तर भाषेवरुन झालेला वाद हा मारहाणी पर्यंत पोहोचला आहे. हे प्रसंग आणि त्यातून उफाळलेले राजकारण, यावर बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सुनील शेट्टी याने स्पष्ट मत मांडले आहे. त्याने भाषासक्तीसाठी होणारी मारणार चुकीची आहे असे म्हटले आहे.
काय म्हणाला सुनील शेट्टी?
अभिनेता सुनील शेट्टी हा त्याच्या बिनधास्त वक्तव्यासाठी विशेष ओळखला जातो. त्याने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलीखमध्ये मराठी भाषेवरील सध्याचे राजकारण आणि त्यातून होणारा हिंसाचार याबाबत विचारलेल्या प्रश्नाला त्याने थेट उत्तर दिले. “मराठी भाषेवरून राजकारण करणे आणि सक्तीने बोलायला लावण्यासाठी हिंसाचार करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. गरीब माणसाला मारहाण करून काही साध्य होणार नाही” असे सुनील शेट्टी म्हणाला.
“आपल्या मुलांवरही जबरदस्ती करत नाही“
सुनील शेट्टी पुढे म्हणाला, “मी स्वतः मुंबईकर आहे. या शहराने मला नाव, यश, प्रतिष्ठा, सगळंच दिलं. म्हणूनच मी मनापासून सांगतो, मुंबईत राहायचं असेल तर मराठी बोलणं आणि शिकणं अत्यंत आवश्यक आहे. जिथे राहतो तिथल्या भाषेत बोललो की त्या ठिकाणच्या लोकांचे आपल्यावरचा प्रेम आणि आदर दहापटीने वाढतो. मी घरी माझ्या स्टाफशी नेहमी मराठीतच बोलतो. पण हेही तितकंच खरं की, भाषा शिकवण्यासाठी किंवा बोलायला लावण्यासाठी कुणावरही जबरदस्ती होता कामा नये. आपल्या लेकरालाही जबरदस्तीने काही शिकवता येत नाही, मग दुसऱ्याला कसे काय भाग पाडणार?”
सुनील शेट्टीच्या या विधानाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून, भाषेचा आदर आणि प्रेम यांचा संदेश देताना हिंसाचार आणि सक्तीला ठाम नकार देण्याच्या त्याच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.
सुनील शेट्टीच्या कामाविषयी
सुनील शेट्टीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो तुलू सिनेमात पाहुण्या कालाकारच्या भूमिकेत दिसला होता. त्यापूर्वी त्याने घनी या तेलुगू चित्रपटात काम केले आहे. तसेच त्याचा केसरी वीर हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Leave a Reply