
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील शालिनी या पात्राची सर्वाधिक चर्चा झाली. सुप्रसिद्ध अभिनेत्री माधवी निमकरने ही व्यक्तिरेखा अक्षरश: जिवंत केली. खलनायिका म्हटलं की शालिनी आपसूकच डोळ्यासमोर उभी राहते.
मात्र आता शालिनी नाही तर तायडीच्या रुपात ती प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. स्टार प्रवाहच्या 'तुझ्या सोबतीने' या नव्या मालिकेतून माधवी पुन्हा एकदा खलनायिका साकारणार आहे. पुन्हा एकदा खलनायिका साकारण्यासाठी प्रचंड उत्सुक असल्याची भावना तिने व्यक्त केली.
तायडी या भूमिकेविषयी सांगताना माधवी म्हणाली, “सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका संपल्यानंतर खलनायिका साकारण्यासाठी विचारणा होत होती. मात्र मला काहीतरी नवं आणि आव्हानात्मक करायचं होतं. याच कारणास्तव सहा महिन्यांचा ब्रेक घेतला होता.”
या सहा महिन्यात कुटुंबाला वेळ दिला. 'तुझ्या सोबतीने' मालिकेतल्या तायडी या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हा त्या भूमिकेचं वेगळेपण मला भावलं. आधीच्या पात्रापेक्षाही आणखी छान पद्धतीने व्यक्तिरेखा कशी रंगवता येईल याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे,” असं ती पुढे म्हणाली.
तायडी इतरांना गिल्ट देऊन त्यांच्याकडून काम करुन घेण्यात तरबेज आहे. तिचा नशिबावर अजिबात विश्वास नाही. तिच्या मते आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवायची असते. नशिबावर सोडायची नसते. प्रचंड फिटनेस फ्रिक असलेल्या तायडीला खाण्यात पदार्थाच्या जागी कॅलरीज दिसतात.





Leave a Reply