
Ashok Tondon Book: संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील तीव्र शाब्दिक हल्ले आपण अधिवेशनातून अनुभवतो. सरकारवर विरोधक तुटून पडतात. कधी कधी तर अत्यंत जहाल शब्दप्रयोग, आरोप-प्रत्यारोपांनी संसदेचे कामकाज ठप्प करण्याची वेळ येते. पण जेव्हा एखाद्या नेत्यावर संकट येते तेव्हा हे नेते एकमेकांची आवर्जून विचारपूस करतात. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Atal Bihari Vajpayee-Sonia Gandhi) यांच्यातील एक किस्सा समोर आला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचे सल्लागार अशोक टंडन यांनी त्यांच्या पुस्तकात या गोष्टीचा उल्लेख केला आहे. काय होती ती घटना?
Ashok Tondon यांनी वर्ष 1998 ते 2004 पर्यंत NDA सरकारमधील काही किस्से त्यांच्या पुस्तकात ‘अटल संस्मरण’ मध्ये हे खुलासे केले आहेत. या पुस्तकात अशोक टंडन यांनी 13 डिसेंबर, 2001 रोजी संसद हल्ल्यावेळी काय काय घडले याची इत्यंभूत माहिती दिली आहे. हा हल्ला झाला तेव्हा अटल बिहारी वाजपेयी आणि लोकसभेच्या तत्कालीन विरोधी पक्ष नेत्या सोनिया गांधी यांच्यात फोनवर दीर्घ चर्चा झाली. जेव्हा हा हल्ला झाला. तेव्हा वाजपेयी हे त्यांच्या निवासस्थानी होते. तर सुरक्षा रक्षक दहशतवाद्यांशी मुकाबला करत असल्याचे वृत्त ते टीव्हीवर पाहत होते. त्यावेळी मंत्रिमंडळातील काही जण उपस्थित होते.
आणि सोनिया गांधी यांचा फोन आला
अशोक टंडन यांनी सांगितले की, हल्ल्यामुळे पंतप्रधानांच्या निवासस्थानी चिंतेचे वातावरण होते. या गंभीर वातावरणात अचानक टेलिफोनची रिंग वाजली. तिकडून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या होत्या. वाजपेयी यांना फोन देण्यात आला. “मला तुमची काळजी वाटत आहे, तुम्ही सुरक्षीत आहात ना?”, अशी विचारणा सोनिया गांधी यांनी केली. सोनियाजी मी सुरक्षीत आहे. मला तुमची चिंता सतावत होती. “मला वाटले की तुम्ही संसदेत तर नाही ना…आपली काळजी घ्या.” असे उत्तर वाजपेयी यांनी दिली. दोन्ही नेत्यांमधील हा संवाद भारतातील राजकीय सुसंस्कृतपणाचे एक उत्तम उदाहरण आहे.
वाजपेयी यांचा हा आदर्श कोण घेणार?
अशोक टंडन यांनी त्यांच्या पुस्तकात एक घटना सांगितली आहे. अर्थात हे उघड सत्य आहे. त्यावर अनेकदा अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्वभावाच्या छटा समोर येतात. जेव्हा पक्षातून त्यांना पंतप्रधान होण्यासाठी दबाव वाढला, तेव्हा ते तडक राष्ट्रपती भवनात पोहचले आणि त्यांनी क्रमांक दोनचे नेते लालकृष्ण अडवाणी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे केले. वाजपेयी पंतप्रधान पद घेण्यासाठी अजिबात उत्सुक नव्हते. बहुमताच्या जोरावर लोकप्रिय पंतप्रधानांना राष्ट्रपती करणे हे भारताच्या संसदीय लोकशाहीसाठी चांगले संकेत नसल्याचे वाजपेयींचे मत होते. त्यामुळे आपण या विचारांच्या विरोधात असल्याचे वाजपेयी ठामपणे म्हणाले होते.
Leave a Reply